शिवाजी महाराजांचा मला कमालीचा अभिमान वाटतो.
का?
कारण, शिवराय माणूस होते. माझ्यासारखेच दोन हात, दोन पाय, दोन डोळे, एक मेंदू असलेला हट्टाकट्टा मनुष्य होता तो. तरीही त्यांनी आपल्या मनगटातल्या ताकदीने स्वराज्य उभं केलं. शिवराय देव असते तर कदाचित आज वाटणारा अभिमान वाटला नसता मला. कारण, देवच तो. त्याला ‘काहीही’ शक्य आहे. त्यात फारसं कौतुकास्पद ते काय? उलटपक्षी प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करणारे शिवराय मला जास्त प्रिय वाटतात. प्रेरणा देतात.
तसा मला साईबाबांबद्दलही आदर वाटतो.
कारण तोही माणूसच होता. अपूर्व मायेने.. अमाप कष्टाने त्या माणसाने समाजाला शहाणं करण्याचा प्रयत्न केला.
अगदी आजचं बोलायचं तर बाळासाहेब ठाकरेंचा बाणाही मला अचंबित करतो.
कारण, बाळ ठाकरे नावाचा एक चित्रकार साठच्या दशकात मैदानात उतरतो आणि तमाम मराठी जनतेला आपलंसं करतो, असं देवाचंही उदाहरण नाही. एक माणूस ‘चला’चा नारा देतो आणि सबंध महाराष्ट्र सोबत चालू लागतो. ही मला कमाल वाटते.
अशा निकषांनी मला संभाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज यांच्यापासून महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, नेल्सन मंडेला, मदर टेरेसा, दादासाहेब फाळके, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत, झाकीर हुसेन, ए.पी.जे अब्दुलकलाम, एस.एल.भैरप्पा ही सगळी सगळी माणसं होती.. आहेत. म्हणून त्यांच्या कामगिरीचं मला नेहमीच अप्रूप, कौतुक वाटत आलं आहे.
आता जरा गल्लत झाली आहे.
या सगळ्या माणसांना दैवत्व प्रदान करण्याचा हावरट हेतू आकाराला येतो आहे.
माणसातलं माणूसपण संपवण्याच्या वाटेवर असलेल्या या मारेकऱ्यांना कोण वठणीवर आणणार हा प्रश्न सतत मनात घर करतो.
मनुष्य वंशात जन्म घेऊन त्यांनी पराक्रम केल्यामुळेच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं. शंकराच्या सागरप्राशनापेक्षा शिवरायांनी करवून घेतलेली आग्र्याची सुटका मला जास्त अचंबित आणि प्रेमात पाडते ती त्यामुळेच. मग या अशा हिमालयाएवढ्या लोकांना जर आपण देवपण दिलं तर त्यांच्या कर्तृत्वाचा तो अपमान आहे, हे आमच्या अजून लक्षातच येत नाही.समजूनच घ्यायचं नाहीय आम्हाला.
कदाचित दैवत्व दिलं की काम सोपं होतं. वर्षातून एकदा सेलिब्रेशन आणि रोज उदबत्तीच तेवढी लावावी लागते.
दुर्दैवाने मी त्याच समाजाचा घटक आहे.
............................................................................................. पुस्तकातून