Sunday, June 30, 2013

फार छान गाता हं तुम्ही.
अहो तुमच्यासारखे ऐकणारे आहेत म्हणून तर आमच्या गाण्याचं कौतुक.
 ..
फार छान लिहितोस तू
तुम्ही वाचता आवर्जून? वा. नक्की वाचत रहा.
 ..
या चित्रातली रंगसंगती केवळ अप्रतिम.
अजूनही आहेत. परवा प्रदर्शन आहे. या बघायला नक्की.
 ..

कलेला प्रतिसादाचा शाप आहे असं वाटतं. प्रतिसाद हवाच. अन्यथा ती कला नव्हे. म्हणजे... गणं ऐकणारा.. लिखाण वाचणारा.. आवर्जून चित्र पाहायला जाणारा नसेल तर मग या कलांनी काय करायचं?  एकटं व्यक्त होण्याचा अधिकार त्यांना नाहीच. शिवाय श्रोते वा वाचकांची ‘आकलनाची लाइन’ ठरवणार कशी? तो पेच आहेच.
म्हणजे पाहणाऱ्याच्या आकलनावर माझी कला अवलंबून. माझं लिखाण मला कच्चं वाटत असलं आणि त्याला प्रतिसाद उत्तम आला तरी ते लिखाण चांगलंच. तेच एखादं उत्तम लिखाण प्रेक्षकांच्या पचनी पडलं नाही तर ते रद्दड? हीच बाब चित्रांची. गाण्याची. गायकाला, कलाकाराला वा लेखकाला काय आवडतं.. तो कुठे अधिक मोकळा होतो हे पाहायचं की नाही? सतत दुसऱ्याला समजेल अशाच भाषेत व्यक्त होत रहायचं कलेतून.
कलाकार बंधनांमध्येच मोठा होतो बहुतेक. 


उगाच काहीतरी निरर्थक लिहिणं हे. काहीतरी खुळ डोक्यात जातं आणि हे असं दूध उतू गेल्यागत होतं अधूनमधून.
असो. 
....................................................................................... पुस्तकातून.


Thursday, June 13, 2013

काय लिहू?
कसं लिहू?
काय होईल लिहिल्यामुळे?
शब्द सांडत जातील एकामागोमाग एक
या पहुडलेल्या पांढऱ्या माळरानावर काळी गोलाई डोलेल.
बदल झाला तर फक्त एवढाच.
बरं, येवढं करून जे म्हणायचंय ते नेमकं उमटेल याची शाश्वती नाही.
समजा, जे जे हवं ते ते लिहिलं जरी,
तरी ते वाचणाऱ्याच्या डोळ्यात उतरेल याची खात्री नाही.
मग कशाला लिहायचं?
आणि काय लिहायचं?
साऱ्या खटाटोपानंतर समाधानाचा शोध संपत नाहीच.
केवळ आणि केवळ ‘ह्याला काही म्हणायचंय बहुतेक’ येवढचं लक्षात येतं समोरच्याच्या.
या शोधातला मैलाचा दगड दृष्टीस पडतो तो हा एवढाच.
................................................................................. पुस्तकातून.

Monday, June 3, 2013

सगळं मागे ठेवून निघून जायचंय इथून.
इथे मळलेली कपाळं आहेत.
जळलेली विषण्ण मनं आहेत.
गोलाई हरवलेले ओसाड मेंदू आहेत.
सतत कोलांट्या मारणारी मतं आहेत.
भर रस्त्यात फतकल मारून बसणाऱ्या नजरा आहेत.
हे सगळं सगळं मागे ठेवून निघून जायचंय.


टाच रोवून उभं राहता येईल
अशा भक्कम जमिनीचा तुकडा हवा आहे.
मतांना तर्कांची भीती नसावी..
उगारलेल्या बोटांना पक्षपाताची बाधा नसावी.
... निघून जायचंय इथून.

कंबरेवरचा वर्षानुवर्षं तसाच ठेवलेला हात झटकायची वेळ आली आहे.
भाळी उतरलेल्या चंद्राला पुन्हा आकाशी जाण्याचा हुकूम द्यायचा आहे.

खांद्यावरल्या धनुष्याला भात्यातल्या बाणाशी परिचय आता व्हायचा आहे.
हातातला कमंडलू फेकून द्यायची तसदी घ्यायची आहे. 

..इथून जाण्यसाठी..
सगळं मागे ठेवून निघून जाण्यासाठी.
......................................................................... पुस्तकातून.