Sunday, April 14, 2013

मीः असं का बसलायस इथे?
तोः विचार करतोय.
मीः कसला?
तोः तण फार झालेत. जमीन नापिक झालीय. काही नव्याने उगवत नाहीय इथे.
मीः अरे उगवेल की. बी पेर. पाणी घाल.
तोः अरे नुस्तं बी पेरून, पाणी घालून नसतं होत काही. जमीन जिवंत लागते.
मीः  ही नापिक झालीय कशावरून?
तोः बघ की. दिसत नाहीत तण. उगवलेलं खुरटं गवत. च्यायला झाडं आहेत तीही काटेरी.
मीः मग काढ ते सगळं. स्वच्छ कर जमीन.
तोः तेच म्हणतोय. एकदाची पेटवून टाकतो हिला. काय ते एकदाच जळून जाऊ दे.
मीः जाळतोस कशाला? धीराने स्वच्छ कर.
तोः अरे तशी व्हायची नाही ती. पार जीवात घुसलाय तिच्या हा ओसाड माळ. जाळावंच लागेल. एकदा जमीन जाळली की स्वच्छ होईल बघ सगळं. त्रास होईल थोडा. सुक्यासोबत ओलंही जळेल. पण, ही सगळी घाण जाईल दारातून.
मीः वा. मग नवी सुरुवात. नवी पेरणी.. नवं बी. नवा अंकुर.
तोः तेच की. नवा अंकुर बघायचा असेल तर जमिनीला जळावं तर लागेलच.
मीः हं.. पण मन जळतंय रे.
तोः मनाच्या जाळाचं कसलं घेऊन बसलास लेका. मनातल्या आगीनं मन स्वच्छ होत नसतं.
मीः असं?
तोः मग. मनातल्या आगीनं मनातले तण वाढतात बाळा. खुरटी, बुरसटली, मरून वर्षं झालेली रोपटी नव्याने वाढतात. बिनपानांची खोडं उगवतात झटाटा. बाबा रे. जमीनीची आग परवडली. पण, मनाची होरपळ  भलती वाईट. नको लाऊन घेऊस मित्रा. होरपळशील. आतल्या आता जळत जाशील. या जाळाला ना धूर ना ज्वाला. तिचं तंत्र वेगळं आहे. थंड करते. शांत करते. नव्या कोंबांना शमवून टाकते.
मीः अरे ए.. कुठल्या कुठे चाललायंस. जमिनीच्या जळण्याबद्दल बोलत होतो आपण.
तोः अहं. ते मी बोलत होतो. तू मनाच्या जळण्याबद्दल बोललास. 
............................................................................ पुस्तकातून.