Monday, June 3, 2013

सगळं मागे ठेवून निघून जायचंय इथून.
इथे मळलेली कपाळं आहेत.
जळलेली विषण्ण मनं आहेत.
गोलाई हरवलेले ओसाड मेंदू आहेत.
सतत कोलांट्या मारणारी मतं आहेत.
भर रस्त्यात फतकल मारून बसणाऱ्या नजरा आहेत.
हे सगळं सगळं मागे ठेवून निघून जायचंय.


टाच रोवून उभं राहता येईल
अशा भक्कम जमिनीचा तुकडा हवा आहे.
मतांना तर्कांची भीती नसावी..
उगारलेल्या बोटांना पक्षपाताची बाधा नसावी.
... निघून जायचंय इथून.

कंबरेवरचा वर्षानुवर्षं तसाच ठेवलेला हात झटकायची वेळ आली आहे.
भाळी उतरलेल्या चंद्राला पुन्हा आकाशी जाण्याचा हुकूम द्यायचा आहे.

खांद्यावरल्या धनुष्याला भात्यातल्या बाणाशी परिचय आता व्हायचा आहे.
हातातला कमंडलू फेकून द्यायची तसदी घ्यायची आहे. 

..इथून जाण्यसाठी..
सगळं मागे ठेवून निघून जाण्यासाठी.
......................................................................... पुस्तकातून. 



2 comments:

  1. लेखणीला सूर लागतो असं म्हटलं तर ही खरी आर्त तान म्हणावी का मित्रा ?

    ReplyDelete
  2. माहीत नाही रे विजू. सूर गवसलाय की सुराचा शोध सुरू आहे याचीही काही कल्पना येत नाहीये. काय चाल्लंय काही कळत नाही. मग थेट शरणांगत होतो आणि जे येईल ते येऊ देतो इतकंच.

    ReplyDelete