Thursday, February 28, 2013

मला समजून घेण्यात नेहमीच तुझी गल्लत झाली आहे.
तू मला शुभ्र चंद्र दाखवत आलास..
पण मला माझी ओंजळ चांदण्यांनी भरायची होती.
तुला गर्द झाडीतल्या वळणदार काळ्याभोर रस्त्यांचं वेड होतं..
मला सतत ओढ होती ती धुक्यात हरवलेल्या मळलेल्या पायवाटेची.
फुलांनी डवरलेल्या झाडाखाली मला नेऊन
माझ्याही नकळत पाकळ्यांचा पाऊस तुला साधायचा असे..
पण, मला आपणहून पहुडलेल्या या फुलराण्यांना अलगद उचलावं वाटे.
तुला वाटे मी तुझ्यासोबत सूर्योदय पाहावा..
माझ मन मात्र खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या तेजस्वी पात्यांच्या बागडण्यावर असे.
याचा अर्थ तू मला समजून घेण्यातच चूक केलीस असं नव्हे.
अरे, आनंदाच्याही गडद फिक्या छटा असतात. 

आता या रंगात दरदिवशी..
दर प्रसंगी थोडाफार बदल होणं गृहित आहे.
एक नक्की की, या देवाणघेवाणीचा रंग एक असला, की मिळवलं.
म्हणून असं असूनही तू मला आवडतोस.
का माहितीये?
कारण तुझ्या आनंदाचा रंग खरा आहे.
............................................................ पुस्तकातून.


  




 

Sunday, February 24, 2013

निरोप येतात..
फोन होतात..
बोलणी होतात.
गप्पा होतात..
चर्चा होतात..
वाद होतात..
मग...
भेट ठरते.
 कारण ठरतं.
 दिवस ठरतो.
वेळ ठरते.
ठिकाण ठरतं.
पुन्हा निरोप येतात..
काम येतं.
अडचण येते.
वेळ होतो.
भेट फसते.
पुन्हा निरोप येतात.
फोन होतात..
पण, भेट फसवत जाते आपल्याला.
एरवी भेटीतून नाती दृढ होतात असा माझा अनुभव.
तुझा काय असेल तो.. माहीत नाही.
पण, ‘भेट’ हा शेवट असेल का आपला?
म्हणूनच ‘ती वेळ’ येत नसावी.
भेटीनंतर येणाऱ्या पूर्णविरामापेक्षा सतत अधेमधे येणारे हे अल्पविराम, स्वल्पविराम, अर्धविराम बरे.
कारण, इप्सित गाठल्यानंतर येणारं भांबावलेपण गोठवून टाकणारं असतं, हे मी बऱ्याचदा अनुभवलंय.
हे काठिण्य मोडायचं असेल तर डोळ्यासमोर नवं साध्य असावं लागतं.
तुझ्या-माझ्या भेटीनंतर माझ्यासमोर काय इ्प्सित असेल ते नाही माहित मला.
समजा काही आलंच डोळ्यासमोर.. तर तुला ते मान्य असेल का?

......................................................... पुस्तकातून.

Thursday, February 21, 2013


जमिनीपासून दोन इंच वर उडायचं कसंब हाती आलं तेव्हा फार मस्त वाटलं होतं.
इतरांपेक्षा वेगळे असल्याचं समाधान लाभलं होतं.
वेगळ्या दृष्टीचा पर्याय गवसला होता.
आता जमिनीवरल्या काट्यांची तमा नव्हती..
वेगाला सतत मोडता घालणाऱ्या खड्ड्यांची काळजी नव्हती.
तरंगत्या सुखाची लालसा बळावत होती.
आता सर्वांत जास्त वेग आपला..
आता सर्वांत अचूक वेध आपला..
आता बिनबोभाट भटकंती ठरलेली.
आता थांबायचं नव्हतं की कुठे टेकायचं नव्हतं.
..
पण, काळाचं रुप पालटूनही
आलेली ही भरती ओसरेना..
आनंदाची लाट काही सरेना..
वाऱ्याच्या झोक्यांनी काळीज चपापलं. 
फुलल्या छातीत हृदय धडाडलं.
पळते पाय थांबेनात..
जळतो जीव करमेना..

आली लाट ओसरली पाहिजे..
थोडी शांती दे.. थोडं स्थैर्य दे.
आता पाय जमिनीशी हवेत.
नको उडणं.. नको तरंगणं.
 ........................................................ पुस्तकातून.


Monday, February 4, 2013


छान पालक..
छान जन्म..
छान बालपण..
छान शिक्षण..
छान नोकरी..
छान लग्न..
छान मुलं..
छान जगणं..
घालून दिलेल्या वाटेवर फक्त चालत रहायचं.
गवसल्या गोष्टींचा आनंद नाही.
गमावल्या गोष्टींची खंत नाही.
वाट सोडून काही मिळवण्याचा अट्टहास नाही..
की वाटेत आलेल्या अडचणीला लाथाडणं नाही.
मर्यादेपलिकडे जाण्यासाठी झटणं नाही..
आणि नाविन्याची तहान नाही.
 फक्त चालत रहायचं.
वाटेत येईल ते घेत जायचं.
कागदावर मारलेली काही केल्या रेषा सोडायची नाही.
प्रत्येक पाऊल रेषेवर पडलं पाहिजे.
आपली स्पर्धा आपल्याशी?
नव्हे.. आपली स्पर्धा घालून दिलेल्या वाटेशी.
..
..
सरळ रेषेलाही ‘चौकट’ म्हणतात?
.......................................................... पुस्तकातून.