Thursday, February 21, 2013


जमिनीपासून दोन इंच वर उडायचं कसंब हाती आलं तेव्हा फार मस्त वाटलं होतं.
इतरांपेक्षा वेगळे असल्याचं समाधान लाभलं होतं.
वेगळ्या दृष्टीचा पर्याय गवसला होता.
आता जमिनीवरल्या काट्यांची तमा नव्हती..
वेगाला सतत मोडता घालणाऱ्या खड्ड्यांची काळजी नव्हती.
तरंगत्या सुखाची लालसा बळावत होती.
आता सर्वांत जास्त वेग आपला..
आता सर्वांत अचूक वेध आपला..
आता बिनबोभाट भटकंती ठरलेली.
आता थांबायचं नव्हतं की कुठे टेकायचं नव्हतं.
..
पण, काळाचं रुप पालटूनही
आलेली ही भरती ओसरेना..
आनंदाची लाट काही सरेना..
वाऱ्याच्या झोक्यांनी काळीज चपापलं. 
फुलल्या छातीत हृदय धडाडलं.
पळते पाय थांबेनात..
जळतो जीव करमेना..

आली लाट ओसरली पाहिजे..
थोडी शांती दे.. थोडं स्थैर्य दे.
आता पाय जमिनीशी हवेत.
नको उडणं.. नको तरंगणं.
 ........................................................ पुस्तकातून.