Thursday, March 21, 2013

तुझ्या आठवणींचा तहानलेला कल्लोळ सतत हिंदोळत असतो बघ. मग आकाश भेसूर वाटू लागतं आणि जमीन ओसाड. तरीही हा कल्लोळ थांबता थांबत नाही. मग एखादी बेसूर उसळी अचानक फिरते त्या आकाशात आणि भेगाळल्या जमिनीत क्षणात अंतर्धान पावते. मग चहूकडे पसरते भकास, कोरडी, दिशाहीन शांतता.
इच्छेची मरणासन्न चाल पाहिली आहेस कधी? शांततेला पडलेली कोरड अनुभवलीयेस कधी?
आता या निष्प्राण जमिनीवर मौनाचं थडगं बांधेन म्हणतो.
भविष्यात का होईना, पण ही तहान भागवायला येशीलच की तू.
त्यानंतर या हवेतली आर्द्रता वाढेल.. जमिनीवर हिरवाई बहरेल. मग, त्या लुसलुशीत डवरलेल्या गवतावरून सरसरत पुढे जाताना तुझ्या नजरेचा पाय अडखळेलच या थडग्यापाशी.
तेव्हा तुझ्या लक्षात येईल, की आता भले सगळं स्थिरस्थावर झालं आहे. 
पण..
पण, आपली इथे येण्याची वेळ चुकली.
................................................................................... पुस्तकातून.