Monday, May 5, 2014

समज

नेमकं काय झालं
किंवा काय होतं कळत नाही.
पण, कुणीतरी पुरचुंडी उघडतो..
कुणीतरी हात घालून अलगद,
येतील ते शब्द उचलतो.
भिरकावतो मेंदूतून मनाकडे.
साला मनही हुशार.
दिले कुणीतरी म्हणून वेचत नाही काही.
तेही थबकतं.
पाहातं..
हे असं पाहता आलं पाहिजे शब्दांकडे.
शब्द तेच दृष्टी वेगळी.
दृष्टी बदलली की अर्थ उमलतो.
हे असं जमलं पाहिजे.
मग मनधरणी कायमची ठरलेली.
मनही बेणं.
तळहातांच्या होणाऱ्या कमंडलूची वाट पाहणारंं.
कोणता शब्द काय लेवून पडतो ते मी फक्त पाहायचं.
ओंजळ भरली की ती रिती करावी नितळ कोरेपणावर.
काय प्रगटतं..
कसं उमटतं..
देव जाणे.
पण, त्या पुरचुंडी उघडणाऱ्या कुणा एकाला,
नेमकं म्हणायचंय काय..
ते मला तिथे समजतं.
आता मला एक लक्षात आलंय.
पुरचुंडीतला अर्थ गवसण्यासाठी,
कोरेपणा हवाच. 
.............................................. पुस्तकातून