Friday, July 19, 2013


पाहा..
माझी कंबर पार झिजून गेलीय.
हातांचे तळवेही पुरते गुळगुळीत झालेत.
पूर्वी असं इथे विटेवर उभं राहिलं की समोर उभी अथांग गर्दी दिसे.
तीही झिजली आणि दृष्टीचा झोत केवळ या चौथऱ्यापुरताच उरला.
आता या वेशीपलिकडच्या गर्दीचा अंदाज येत नाही.
कपाळावरचा गंधही हल्ली ओघळून पुरता पायाशी येतो.
नाही म्हणायला खांदे आणि गुडघे तेवढे मजबूत उरलेत येवढंच.
 पायात बळ आहे तोवर इथून काढता पाय घ्यावा.
इथे वर्षानुवर्ष ठिय्या मारून उभं राहिल्याने माझ्याच काय तुझ्याही पदरात काही फारसं पडलेलं नाही.
बस झालं आता हे असं स्थितप्रज्ञ उभं ठाकणं.
इतकी वर्ष सतत उभं राहूनही
कंबरेपासून हात विलग करण्याचं स्वातंत्र्य आज मला नाही.
उद्या मी केलंच जरी तसं.. 
तर धर्मांध अविश्वास उफाळून येईल अंगावर.
मग.. इतकी वर्षं असं उभं राहून काय मिळवलं आपण?

म्हणूनच आता कंबरेवरचा हात खाली घेऊन पाहावं म्हणतो.
थोडं माझं अवघडलेपण जाईल.. थोडी तुलाही कवेत घेईन.
शिवाय, ठाम श्रद्धेआडचा फाजिल विश्वासही कळेल आपल्याला.
त्यानंतर मात्र तू म्हणतेस तसं वागेन मी.
इतकी वर्ष काही न बोलता निमूट उभी राहिलीस शेजारी.
आता तुझ्या मागोमाग चालेन म्हणतो.
आता लक्षात येतं...
एका जागी तिष्ठत साचण्यापेक्षा प्रवाही राहिलेलं बरं.
..
..
..
पांडुरंग पांडुरंग
...................................................................  पुस्तकातून.

3 comments:

  1. छान लिहिलं आहेस. :-) आवडलं.. मुख्य म्हणजे समजलं! अभिनंदन!

    ReplyDelete
  2. सात्विक संताप की आत्मिक मनस्ताप ?

    प्रवाहाचा निचरा मात्र व्हायला हवा ,,,

    जिरलं नाही तर उगवणार नाही …

    नाहीतर मग कंबरेवर असलेला हात

    कपाळावर यायला वेळ लागणार नाही…

    शेवट काय तर जाणीव होण महत्वाचं….

    …. मानला मित्रा तुला !

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    ReplyDelete